Home महाराष्ट्र ऊर्जा क्षेत्राला सक्षम करण्यासाठी कालबद्धरित्या प्रकल्पांची अंमलबजावणी करावी -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ऊर्जा क्षेत्राला सक्षम करण्यासाठी कालबद्धरित्या प्रकल्पांची अंमलबजावणी करावी -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्याची ऊर्जा क्षेत्रात ४.१७ लक्ष कोटींची गुंतवणूक

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

५५ सामंजस्य करारांद्वारे ७८,२१५ मेगावॅट क्षमतेची उभारणी

  मुंबई

राज्यात ऊर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक होत असून जलसंपदा विभागाच्या माध्यमातून उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठीचे विविध कंपन्यांसोबत एकूण 55 सामंजस्य करार आज करण्यात आले आहेत. या करारांद्वारे 78,215 मेगावॅट वीज निर्मिती क्षमतेची उभारणी प्रस्तावित आहे. एकूण गुंतवणूक सुमारे ₹4,16,701 कोटी रुपये इतकी अपेक्षित असून या प्रकल्पाद्वारे सुमारे 1,27,990 रोजगार निर्मिती होणार आहे. ऊर्जाक्षेत्राला सक्षम करण्यासाठी करार महत्वाचे असून कालबद्धरित्या या प्रकल्पांची अंमलबजावणी करावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

विधानभवनात राज्यातील उदंचन जलविद्युत प्रकल्पांची (पंपस्टोरेज प्रकल्प) आढावा बैठक मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधितांना सूचित केले. बैठकीस जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा (विदर्भ,तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) मंत्री  गिरीश महाजन यांच्या सह जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर व इतर संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात मोठ्या प्रमाणात ऊर्जा क्षेत्राच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने जलसंपदा विभागाच्या माध्यमातून उदंचन जलविद्युत प्रकल्पांची उभारणी करण्यात येत आहे. या कामाची व्याप्ती वाढवण्याच्या दिशेने या क्षेत्रातील नामांकित विविध कंपन्यांसोबत राज्य शासनाने सांमजस्य करार केले आहेत. आतापर्यंत एकूण ५५ सांमजस्य करार हे उदंचन जलविद्युत प्रकल्पांच्या निर्मितीसाठी करण्यात आले आहेत.  अल्पावधीतच या प्रकल्पांच्या  कामाने गती घेतली असून ५५  पैकी १०३०० मेगा वॅट क्षमतेच्या सहा प्रकल्पांच्या सविस्तर प्रकल्प अहवालांना केंद्रीय  विद्युत प्राधिकरणाची मंजूरी मिळाली असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली आहे. तसेच  ८२०० मेगावॅट क्षमतेच्या पाच प्रकल्पांचे सविस्तर प्रकल्प अहवाल मंजुरीच्या टप्प्यात  आहेत. या गुंतवणुकीमुळे राज्यातील ऊर्जा उत्पादन क्षमता लक्षणीय वाढणार असून औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. या प्रकल्पांच्या उभारणीचे काम गतीने पुढे जात असून विहित कालमर्यादेत हे प्रकल्प कार्यान्वित होतील यादृष्टीने सर्व संबंधित यंत्रणांनी प्राधान्याने आणि समन्वयाने काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर यांनी सांगितले की, उदचंन जलविद्युत प्रकल्पांचे सामंजस्य  करार 12 ऑगस्ट, 3 सप्टेंबर, 26 सप्टेंबर 2024 तसेच 29 एप्रिल, 1 व 15 जुलै, 3 नोव्हेंबर आणि 10 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आले. प्रमुख कंपन्यांमध्ये अदानी ग्रीन एनर्जी लि. (9,900 मेगावॅट, ₹54,450 कोटी, 30,000 रोजगार), एनएचपीसी लि. (7,350 मेगावॅट, ₹44,100 कोटी, 7,350 रोजगार), जेएसडब्लू एनर्जी (8,200 मेगावॅट, ₹36,514 कोटी, 15,200 रोजगार), टीएचडीसीआयएल  (6,790 मेगावॅट, ₹33,622 कोटी, 6,300 रोजगार) आणि टोरंट पॉवर लि. (5,600 मेगावॅट, ₹28,000 कोटी, 13,500 रोजगार) यांचा समावेश आहे.

याशिवाय टाटा पॉवर कंपनी लि., एनटीपीसी लि., जेएसडब्ल्यू निओ एनर्जी लि., मेघा इंजि. अँड इन्फ्रा लि., वेलस्पन न्यू एनर्जी लि., रिन्यू हायड्रो पॉवर प्रा. लि., महाजेनको रिन्यूएबल एनर्जी लि. आणि अवाडा ॲक्वा बॅटरीज प्रा.लि या कंपन्यांनीही सामंजस्य करार केलेले आहेत.

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00