52
पुणे
आजची तरुण पिढी पाश्चात्य संस्कृतीकडे अधिक झुकलेली दिसते, ज्यामुळे ती आपल्या भारतीय मूळ आणि संस्कृतीपासून दूर जात आहे. समाजातील ‘स्टँडर्ड्स’ टिकवण्यासाठी पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण केले जाते, परंतु यामुळे नैराश्य आणि मानसिक तणाव वाढतो. उदाहरणार्थ, मी एका मुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्ण नाव विचारले असता तो उत्तर देऊ शकला नाही, परंतु नेपोलियनबद्दल सहज बोलत होता. ही स्थिती आपली खरी ओळख हरविण्याचे प्रतीक आहे.
आजचे तरुण इंग्रजीला हिंदी किंवा मराठीपेक्षा अधिक श्रेष्ठ मानतात. ‘यो, वॉट्सअप’ यांसारखे शब्द त्यांच्या दृष्टीने “कूल” ठरतात, परंतु ते आपल्या भाषेच्या आणि इतिहासाच्या समृद्धतेकडे दुर्लक्ष करतात. त्यांना २५ डिसेंबर म्हणजे ख्रिसमस माहित आहे, पण हा दिवस भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती असल्याचे माहित नाही. स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या महान व्यक्तींच्या त्यागाचा विसर पडलेली ही पिढी आपले आदर्श कोठे गमावून बसली आहे?
यासोबतच, धर्मनिरपेक्षतेच्या बाबतीतही दुहेरी मापदंड पाहायला मिळतात. दिवाळीत फटाके फोडल्याने प्रदूषण होते, असे सांगणारे लोक नवीन वर्षाच्या स्वागतासाठी फटाके फोडतात किंवा ख्रिसमसला मेणबत्त्या पेटवतात, त्यावर कोणीही प्रश्न उपस्थित करत नाही. यासाठी मर्यादित आधुनिकता महत्त्वाची आहे. प्रत्येक पाश्चात्य गोष्ट स्वीकारणे चुकीचे आहे.
आजची पिढी भारतीय संशोधकांपेक्षा पाश्चात्य वैज्ञानिकांना श्रेष्ठ मानते. पण त्यांना कोण सांगणार की विमानाचे पहिले संशोधन भारतीयांनी केले होते? अथर्ववेद आणि ऋग्वेद यांसारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये विज्ञान, आरोग्य आणि जीवनाचे अनमोल ज्ञान आहे. मात्र, या गोष्टींवर चर्चा करण्यास कोणीही तयार नाही.
तरुणांनी आपल्या मूळ ओळखीकडे परतले पाहिजे. पाश्चात्य आधुनिकतेचे अंधानुकरण न करता भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगणे गरजेचे आहे. या विचारांना समाजात रुजवण्यासाठी आणि नव्या पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे.
अथर्व देवरे
अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी युवा वॉरियर, कोथरूड विधानसभा
Please follow and like us:
