थेरगाव येथील अन्‍यायग्रस्‍त दलित कुटुंबाची फिर्याद दाखल होणार 

अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर बाबा कांबळे यांचे आत्मक्लेष सत्याग्रह आंदोलन स्थगित
पिंपरी ! प्रतिनिधी  
थेरगाव येथील पिडित असलेल्‍या दलित कुटुंबियांची फिर्याद दाखल करण्याचे आश्‍वासन पिंपरी-चिंचवड पोलिस प्रशासनातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिले आहे. कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांच्‍याशी झालेल्‍या चर्चेनंतर हे आश्‍वासन देण्यात आले. तसेच बाबा कांबळे यांच्‍या मागण्यांवर लवकर कार्यवाही केली जाईल, असेही आश्‍वासन दिले. त्‍यामुळे आत्‍मक्‍लेश सत्‍याग्रह आंदोलन स्‍थगित करत असल्‍याची माहिती बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली.
काल पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्‍या बैठकीत बाबा कांबळे यांच्‍या मागण्यांबाबत सविस्‍तर चर्चा करण्यात आली. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, पिंपरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, आदी वरिष्ठ पोलीस अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.या वेळी हा निर्णय घेण्यात आला.
थेरगाव येथील कुटुंबावर पाणी पुरवठा तोडून अन्‍याय केला आहे. त्‍यासाठी ते कुटुंब मुंबईपर्यंत चालत जाऊन मुख्यमंत्र्यांपर्यंत आपली कैफियत मांडणार आहेत. हे सर्व प्रकरण दुर्देवी असल्‍याचे सांगत या बाबत आंदोलन करणार असल्‍याचा इशारा कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी दिला होता. शहरात कायदा व सुव्यवस्‍थेचा बोजवारा उडाला असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले. त्‍यांच्‍या इशाऱ्यानंतर पोलिस प्रशासनाने त्‍वरीत पाऊले उचलली आहेत.
दलित कुटुंबावरील अन्‍याय. सावकारी त्रासावरून झालेल्‍या आत्‍महत्‍या या सर्व प्रकरणाचे एसीपी दर्जाच्‍या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी होणार आहे. सध्या मुंबई येथे पायी चालत गेलेल्या दलित कुटुंबाची फिर्याद घेण्यास पोलीसांनी सकारात्‍मकता दाखवली आहे. पोलीस आयुक्त कार्यालयाच्या वतीने पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 विशाल गायकवाड व सहाय्यक पोलीस आयुक्त कुराडे साहेब यांनी मुंबई आझाद मैदान येथे महिला पोलिस कर्मचारी पाठवण्यात आले आहेत. पीडित दलित कुटुंबाची फिर्याद घेण्यात येणार आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मार्फत चौकशी केली जाईल, अशी माहिती बाबा कांबळे यांनी बैठकीनंतर दिली.
या सर्व बैठकीनंतर सर्व मागण्यांबाबत सकारात्‍मक तोडगा काढण्याचे आश्‍वासन मिळाले आहे. त्‍यामुळे आत्‍मक्‍लेश सत्‍याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. प्रत्येक शनिवारी तक्रार अर्ज संदर्भामध्ये तक्रार निवारणासाठी जनता दरबार घेण्यात येतो याबाबत सर्वसामान्य माणसांना अधिक जागरूकता व्हावी यासाठी याबाबतची प्रसिद्धी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयाच्‍या वतीने करण्यात येणार आहे. हे आंदोलनाचे यश आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयाच्या वतीने दिलेले आश्वासन पुढील 15 दिवसात पूर्ण न केल्यास शहरांमध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल असे देखील यावेळी बाबा कांबळे म्हणाले.
Please follow and like us:

Related posts

संजयनगर, फुगेवाडी येथील झोपडपट्टीतील विनापरवाना झोपडीवर निष्कासन कारवाई

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महिला आयटीआयमध्ये ऑगस्ट २०२६ प्रवेश प्रक्रिया सुरू 

महापालिकेत विविध अधिकाऱ्यांना अतिरिक्त कार्यभाराचे वाटप