ठाणे
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अपघाताच्या आदल्या दिवशी मोटारीने बारामतीला जाणार होते. त्यासाठी सर्व तयारी केली. परंतु आयत्या वेळीस एक महत्त्वाचे काम घेऊन प्रफुल पटेल आले त्या कामाला वेळ लागला आणि अजितदादा मोटारीऐवजी दूसरे दिवशी विमानाने बारामतीकडे रवाना झाले. दुर्देवाने त्या विमानाला अपघात झाला आणि आपण अजिदादांना गमावले, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी दिली.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या पुढाकाराने अजितदादा पवार यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी सर्वपक्षिय शोकसभेचे आयोजन मंगेशी बँक्वेट सभागृहात करण्यात आले होते. या शोकसभेत सर्वपक्षिय कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अजितदादांच्या अपघाताची बातमी आपल्याला फोनद्वारे समजली, लगेचच त्यांच्या स्वीय सहाय्यकांकडून संपूर्ण माहिती घेतली. त्यानंतर पुढील तीन तास आपण सुन्न झालो होतो. जिल्हा परिषद निवडणूकीच्या प्रचारासाठी अजितदादा बारामतीमध्ये सभा घेणाार होते. सभेला जाण्यासाठी आदल्या दिवशी संपूर्ण तयारी केली. सर्व सामान मोटारगाडीत भरले, जाण्याची तयारी झाली तेवढ्यात प्रफुल पटेल यांनी एका कामाची फाईल आणली. ते काम करता करता उशिर झाला आणि अजितदादांनी मोटारीने जाण्याऐवजी दुसरे दिवशी विमानाने जाण्याचे ठरविले. त्यानंतर अकल्पित घटना घडली अशी आपल्याला माहिती मिळाल्याचे प्रमोद हिंदूराव यांनी आपल्या श्रध्दांजलीपर भाषणात सांगितले.
अजितदादांबरोबर आपले ३९ वर्षे अतिशय जवळचे संबंध होते. त्यांचा दुसरे दिवशी होणारा कार्यव्रâम आपल्याकडे नेहमी पोहचत असे. दादांच्या अनेक कामांचे आपण साक्षीदार आहोत. कल्याणला आपल्या घरी दादा आणि सुनेत्रा वहिनी अनेकदा येवून गेल्या. दादांनी शेवटची भेट आपल्या घरी दिली तेव्हा आपण त्यांना माळशेज घाटापर्यंत सोडायला गेलो होतो. त्यासमयी झालेल्या संवादाची माहिती देत दादांच्या अनेक आठवणी जागविल्या.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले की जन्म व मृत्यू माणसाला कळत नाही. त्यांनी केलेले काम हे ज्या वेळेस ती व्यक्ती मरण पावते व त्यांच्या अंत्यविधीला जनसमुदाय जमतो तेव्हा त्यांनी केलेले काम किती मोठे आहे हे समजते, अजित दादांनी बारामती मॉडेल तयार केले, ते एकदा जाऊन बघा. दादांनी जे काम केले तसे काम प्रत्येक प्रभागात प्रत्येक तालुक्यात व जिल्ह्यात करा व दादांना कामातून श्रद्धांजली अर्पण करा असे सांगून आपण सर्वांनी आपल्या कामातूनच दादांना खरी श्रद्धांजली वाहणार आहोत.
ज्येष्ठ पत्रकार तुषार राजे यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला. यशवंतराव चव्हाण विद्यापिठातून तयार झालेला शेवटचा लोकनेता असे सांगत अजितदादा यांच्या झटपट निर्णयाची माहिती दिली. दादांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न अपुरे राहिले. २००४ साली राष्ट्रवादीला जास्त जागा मिळूनही राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपद घेतले नाही. तेव्हा दादा मुख्यमंत्री झाले असते आणि आपल्याला वेगळा महाराष्ट्र बघायला मिळाला असता. महाराष्ट्राने एक अभ्यासू व चांगला लोकनेता गमावला आहे. अजितदादांना ग्रामीण व शहरी भागाची पूर्ण माहिती होती. दादा हे महाराष्ट्राच्या मातीतील नेते होते. साधू-संत-बुवाबाजी-कर्मकांडावर दादांचा विश्वास नव्हता. त्यांनी कधीही हाताला गंडेदोरे बांधले नाहीत. अजितदादांचा आदर्श आपण घेतला पाहिजे, हिच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे, डॉ. गिरीश लटके, जिल्हाध्यक्ष वंडारशेठ पाटील, सरचिटणीस सुभाष गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार तुषार राजे, नगरसेवक वरूण पाटील, माया कांबळे, माजी नगरसेवक संजय पाटील, प्रकाश तरे, ठाकरे सेनेचे शहरप्रमुख बाळा परब, आम आदमी पक्षाचे शैलेश जोगदंड, मराठा ज्ञाती समाजाचे योगेश देशमुख, शिंदे सेनेचे प्रवक्ते किरण सोनवणे, पत्रकार विष्णुकूमार चौधरी, उत्तम रोकडे, रमेश साळवे, रमेश बर्वे, प्रशांत माळी, राणी कपोते, नितीन सकपाळ, स्वप्निल ताकावणे, पारसनीस तिवारी, राष्ट्रवादी शरद गटाचे शहराध्यक्ष स्वप्निल रोकडे, दिपक ठाकूर, शत्रुघ्न भोईर, खैरे सर यांच्यासह सर्वपक्षीय नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शोक सभेचे सूत्रसंचालन डॉ प्रदिप जगताप यांनी केले.
