62
मुंबई
नागपूर मध्ये दंगल घडविणारे हिंसाचार करणारे व पोलिसांवर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांची गैय केली जाणार नाही त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये दिली.
छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद येथे असलेली औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्यावरुन नागपूरमध्ये काही भागात दंगल झाली. या दंगलीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन दिले. नागपूरमध्ये नेमकी कोणकोणत्या भागात दंगल झाली ? दंगलीला कशी सुरुवात झाली ? दंगलीमुळे झालेले नुकसान ? नागपूरमधील सध्याची स्थिती ? याबाबतची सविस्तर माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. दंगल करणारे, पोलिसांवर हल्ले करणारे आणि सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणारे यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
विधानसभेत निवेदन देत मुख्यमंत्र्यांनी नागपूरमध्ये सोमवार १७ मार्च २०२५ रोजी दंगल का आणि कशी घडली याबाबतची सविस्तर माहिती दिली. संपूर्ण घटनाक्रम सांगितला. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाजी कबर हटवावी अशी मागणी करत नागपूरमध्ये सोमवार १७ मार्च रोजी आंदोलन केले. यावेळी प्रतिकात्मक कबरीला आग लावण्यात आली. एक कापड जाळण्यात आले. या कापडावर धार्मिक मजकूर होता अशी अफवा पसरली. ही अफवा पसरली आणि अत्तर ओळ येथून नमाज पढल्यानंतर २०० ते २५० लोकांच्या जमावाने घोषणाबाजी सुरू केली. याच लोकांनी आग लावून टाकू असे हिंसक बोलणे केल्याने पोलिसांनी त्याठिकाणी बळाचा वापर केला.
पोलिसांनी सकाळी घडलेल्या घटनेविरोधात कारवाई करण्यासाठी तक्रारदारांना बोलवले होते. तर दुसरीकडे नागपूरच्याच हंसापुरी भागात २०० ते ३०० लोकांनी दगडफेक केली. काहींवर शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. अनेक वाहने जाळण्यात आली. हिंसाचाराची तिसरी घटना सायंकाळी साडेसात वाजता भालदारपुरा भागात झाली. ८० ते १०० लोकांचा जमाव तिथे होता. त्यांनी तिथे पोलिसांवर हल्ला केला. त्यामुळे पोलिसांनी अश्रूधूर व सौम्यबळाचा वापर केला. या घटनेत एक क्रेन दोन जेसीबी आणि काही वाहने जाळण्यात आली. या संपूर्ण घटनेमध्ये ३३ पोलीस जमखी झाले आहेत. यात उपायुक्त दर्जाच्या तीन पोलिसांचा समावेश आहे. यातील एका अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला आहे; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नागपूरमध्ये झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दंगल करणारे, पोलिसांवर हल्ले करणारे आणि सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणारे यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे. नागरिकांनी कायद्याचे पालन करावे, शांतता राखावी, अफवांवर विश्वास ठेवून नये; असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
Please follow and like us:
