Home राजकीय धमकी देणारा दमदाटी करणारा हप्ते वसूल करणारा माणूस अण्णा आहे 

धमकी देणारा दमदाटी करणारा हप्ते वसूल करणारा माणूस अण्णा आहे 

जयंत पाटील यांचा आकुर्डी सभेत हल्लाबोल 

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

 

पिंपरी

पिंपरी मध्ये धमकी देणारा दमदाटी देणारा हप्ते वसूल करणारा झोपडपट्टी पुनर्वसनामध्ये ठराविक लोकांनाच एस आर ए प्रकल्पाचे काम देणारा व त्यातून पैसे लाटणारा एकमेव माणूस अण्णा आहे. असा घणाघाती हल्ला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आकुर्डी येथील सभेत केला.

पिंपरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत जयंत पाटील बोलत होते.

मागच्या वेळी जी चूक झाली ती दुरुस्त करण्यासाठी आता पिंपरी विधानसभा मतदारसंघातून डॉ. सुरक्षणा शिलवंत यांना विजयी करा असे आवाहन करत जयंत पाटील म्हणाले की, गेल्यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही एक सुशिक्षित महिला म्हणून सुलक्षणा शिलवंत यांना उमेदवारी दिली होती. परंतु काही लोकांनी कुठल्यातरी टोल नाक्यावर अजित पवार यांची गाडी अडवली व येथील उमेदवारी बदलण्याचा आग्रह धरला. अजित पवार यांनी त्यावेळी मला फोन करून आपण अण्णा बनसोडे यांना उमेदवारी देऊ असे सांगितले. तुमचा जिल्हा आहे तुम्ही निर्णय घ्या असे असे मी म्हणालो. परंतु पक्षाने जे रेटिंग केले आहे त्यात सुलक्षणा शिलवंत यांना अण्णा बनसोडे यांच्यापेक्षा जास्त चांगले रेटिंग आहे असेही त्यांना सांगितले होते. परंतु त्यांनी अण्णा बनसोडे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता.

अण्णा बनसोडे यांना विधानसभा सभागृहात बोलताना किंवा पिंपरी चिंचवड शहराचे प्रश्न मांडताना मी कधीच ऐकले नाही. त्यांचे बाकीचे उद्योग खूप मोठे आहेत. असे उद्योग असणारा माणूसच अजितदादा पवारांना आवडतो. असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. पैसेवाला, मसल पॉवर असलेला, दहशत माजवणारा माणूस अजित दादांना चालतो असे सांगत यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाने बहुसंख्य नवे चेहरे दिले आहेत. त्यात पिंपरीमध्ये सुशिक्षित व सुसंस्कृत अशा सुलक्षणा शिलवंत, भोसरीतून इंजिनियर अजित गव्हाणे तर चिंचवड मधून राहुल कलाटे हे नवीन चेहरे आम्ही दिले आहेत.

जयंत पाटील पुढे म्हणाले की, गेल्यावेळी सर्वजण पक्षात होते, त्यावेळेस पक्षाचे चार खासदार निवडून आले होते. परंतु यातले बहुसंख्य लोक पक्षातून बाहेर पडल्यानंतर पक्षाचे आठ खासदार राज्यात निवडून आले. त्यामुळे जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वच्छ झाला असल्याचे संकेत दिले आहेत. आज महाराष्ट्रात सर्वात स्वच्छ असलेला पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष ओळखला जातो. असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लागलेली असून हा देश घसरू लागला असल्याचे तज्ञ सांगू लागले आहेत. इतिहासात रुपयाचे एवढे अवमूल्यन कधीच झाले नव्हते. जर आपल्या खिशात दहा हजार रुपये असतील तर त्याचे मूल्य केवळ आठ हजार इतके आहे. असे सांगत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवत जयंत पाटील म्हणाले की, एकनाथ शिंदेंनी गुजरातचे मंडलिकत्व पत्करलेले असल्याचे दिसते. टाटा एअरबसह जवळपास 17 मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. परंतु मुख्यमंत्र्यांनी एकही शब्द तोंडातून काढला नाही. ते एवढेच सांगतात मी मोदींना भेटून आलो, यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देणार असल्याचे सांगितले. अद्याप एकही प्रकल्प महाराष्ट्रात आला नाही. आता समजले आहे मोठा प्रकल्प म्हणजे महाराष्ट्राला मोदी भोपळा देत आहेत. एकनाथ शिंदे दिल्लीच्या विरोधात बोलू शकत नाहीत. राज्यावर पावणे आठ हजार कोटीचे कर्ज होते आता सव्वा लाख कोटी पर्यंत कर्ज झाले आहे. राज्याला अडचणीत आणण्याचे काम एकनाथ शिंदे अजित दादा पवार व देवेंद्र फडणवीस करत असल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी केला. स्कूटरवर 28% जीएसटी मात्र हेलिकॉप्टरवर पाच टक्के जीएसटी. गरिबाला जास्त कर आणि श्रीमंताला कमी कर. कफनावरही या सरकारने कर लावला असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात दर पंधरा दिवसांनी एक बलात्कार आणि मुलींवर अत्याचार होतो. राज्याची ही परिस्थिती असल्याचे जयंत पाटील म्हणाले .

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर डॉ. सुलक्षणा शिलवंत धर यांनी पवार साहेबांची साथ सोडली नाही. त्यामुळे त्यांना साहेबांनी यावेळी विधानसभेची संधी दिली आहे. सर्वसामान्य माणसाशी हितगुज साधणाऱ्या, सर्वसामान्य माणसाशी बोलणाऱ्या अशा उमेदवार सुलक्षणात शिलवंत मतदारांनी निवडून दिले पाहिजे असे आवाहन करत जयंत पाटील म्हणाले की, राज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. त्यामुळे तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वतः शरद पवार येथे येतील व तुमचे समस्या व प्रश्न ऐकून त्याचे निराकरण करतील असा मी शब्द देतो.

यावेळी बोलताना पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात, काम करणाऱ्या, सर्वसामान्य माणसाचे प्रश्न ऐकणाऱ्या, विकासाचे व्हिजन असणाऱ्या, व शिक्षण असे निकष लावून उमेदवारी दिली जाते. तर विरोधकांकडे पैसा, दहशत, गुन्हेगारी, दादागिरी असे असणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी दिली जाते. गेली अनेक वर्षे हे नेतृत्व या शहरावर लादले गेले आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघ केवळ मतदार संघ राखीव राहिला नाही तर सर्वच मतदार राखीव झाले आहेत काय? असा प्रश्न पडू लागला आहे.

विरोधी उमेदवाराला स्वतःला सुरक्षा घेऊन फिरावे लागते, तो मतदारांना काय सुरक्षा देणार? केवळ मताला पाचशे रुपये आणि मंडळांना वर्गणी देऊन मत मागण्याचे काम ते करतात. आता आपल्या हक्कासाठी आवाज उठवणारा लोकप्रतिनिधी आपल्याला निवडून द्यायचा आहे. हे शहर प्राधिकरण, गावठाण, झोपडपट्टी, सोसायटी, अशी विविधता असलेले हे शहर आहे. या प्रत्येक भागाच्या समस्या स्वतंत्र आहेत. परंतु पैशाच्या जीवावर निवडणुका लढविणाऱ्याला हे प्रश्न माहितीच नाहीत आपल्या जीवावर ते पैसे कमावतात आणि तेच पैसे निवडणुकीत आपल्याला देऊन निवडून येतात. त्यांनी कोणता विकास केला? आमदार निधी कोठे आणला? व कोठे खर्च केला? असा प्रश्न पडतो असे सुलक्षणा शिलवंत म्हणाल्या. हे शहर दहशतमुक्त पाहिजे असेल, गुन्हेगारी मुक्त पाहिजे असेल, येथील बेरोजगारी दूर झाली पाहिजे असेल, महिलांना सुरक्षितता पाहिजे असेल, हे शहर भयमुक्त झालेले पाहिजे असेल, या शहरात परिवर्तन झालेले पाहिजे असेल, या शहराचा सर्वांगीण विकास पाहिजे असेल तर तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोरचे बटन दाबून मला विजयी करा असे आवाहन सुलक्षणा शिलवंत यांनी यावेळी केले.

या सभेत माजी आमदार गौतम चाबुकस्वार, माजी आमदार विलास लांडे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी जेष्ठ नेते आझम पानसरे, रतनलाल सोनाग्रा, पिंपरी चिंचवड शहर शिवसेनाप्रमुख सचिन भोसले, आम आदमी पार्टीचे चेतन बेंद्रे, मीनाताई जावळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे समाजवादी पार्टीचे अध्यक्ष बी डी यादव, पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष डॉ कैलास कदम, माजी उपमहापौर दिनकरराव दातीर पाटील, अमीन शेख मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, स्थानिक कार्यकर्ते गिरीश कुटे रोमी संधू पांडुरंग पाटील रामपात्रे अविनाश रेणके प्रताप गुरव धम्मराज साळवे संतोष कवडे मंदा फड गोविंद भोसले शिरीष जाधव गौरव चौधरी टाटा मोटर्सचे अशोक माने संभाजी ब्रिगेडचे वैभव जाधव रिपब्लिकन पक्ष जोगेंद्र कवाडे गटाचे रामदास ताटे, प्रकाश चव्हाण गुलाब गरुड राहुल शिंपले आदी प्रमुख उपस्थित होते.

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00